ठाणे, दि.१०. ( प्रतिनिधी )
ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील शहर विकास (नगररचना) विभाग कार्यालयात दिनांक ८ जून २०२६ रोजी लागलेली आग ही अत्यंत गंभीर आणि संशयास्पद घटना असून या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
नगररचना विभाग हा विकास आराखडे, बांधकाम परवानग्या, टीडीआर, आरक्षणे तसेच विविध महत्त्वपूर्ण प्रशासकीय कागदपत्रांशी संबंधित संवेदनशील विभाग आहे. त्यामुळे या विभागात आग लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसारमाध्यमांमधून काही महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणात आगीचे नेमके कारण काय होते, सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, कोणत्या कागदपत्रांचे नुकसान झाले, डिजिटल अभिलेख सुरक्षित आहेत का तसेच या घटनेचा सार्वजनिक हिताच्या बाबींवर काही परिणाम झाला आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे ऋषिकेश तायडे यांनी म्हटले आहे.
तसेच त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पुढील मागण्या केल्या आहेत :
• या आगीची सीआयडीमार्फत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
• आगीचे कारण, नुकसानाचे स्वरूप आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी तांत्रिक व फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी.
• आगीत प्रभावित झालेल्या सर्व कागदपत्रे, डिजिटल नोंदी व अभिलेखांचा तपशील सार्वजनिक करण्यात यावा.
• भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व महापालिकांमध्ये अभिलेख संरक्षण, डिजिटल बॅकअप आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे.
• चौकशी अहवाल निश्चित कालावधीत सार्वजनिक करण्यात यावा.
जनतेच्या करातून चालणाऱ्या संस्थांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकून राहण्यासाठी या घटनेची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचेही ऋषिकेश तायडे यांनी नमूद केले असून राज्य शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.




















