वीज पुरवठा बंद करण्याची मागणी….
कोपरगाव, दि.१९ : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यातील मौजे कोकमठाण,शामवाडी ३ चारी येथील ग्रामस्थांनी इंडस कंपनीच्या (एअरटेल आदी) मोबाईल टॉवरसाठी दिलेला ११०० के.व्ही. एक्सप्रेस लाईनवरील विद्युत प्रवाह कायमस्वरूपी बंद करण्याची लेखी मागणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे केली आहे.

एकनाथ रामचंद्र नेहे, गोकुळ नेहे, देविदास लोखंडे, राजेंद्र नेहे, उषाबाई थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोकमठाण शिवारातील सर्व्हे नं. ३७९/२ व ३७९/४३ मधून टाकण्यात आलेली ही विद्युत लाईन २४ तास प्रवाहीत असल्याने परिसरातील रहिवाशांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. लाईन व टॉवरमुळे होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे माणसे, चिमण्या, पक्षी व पर्यावरण यावर दुष्परिणाम होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
मे २०२५ रोजी या लाईनखाली मंडपाचे काम करीत असताना सागर नेहे, गणेश पवार, मनीषा कदम व अलंका नेहे यांना विद्युत धक्का बसून गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. याबाबत कोपरगाव पोलिस ठाण्यात विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, इंडस कंपनी व जागामालक यांनी जमीनमालकांची रितसर परवानगी घेतलेली नाही. कोणताही करार न करता बेकायदेशीररित्या विद्युत सप्लाय सुरू असून यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. भविष्यात जर कुणाला इजा अथवा मृत्यू झाला, तर यासंदर्भात इंडस कंपनी, जागामालक व वीज वितरण कंपनीच जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला यापूर्वीही लेखी तक्रार दिली असून, आता एक्सप्रेस लाईनवरील प्रवाह कायमस्वरूपी खंडित करून टॉवरचे स्थलांतर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.




















