नगरपरिषदेच्या उदासीनतेवर संजय काळे यांचा सवाल
कोपरगांव : दिलीप गायकवाड
कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील शहर विकास योजनेंतर्गत आरक्षण क्रमांक ९९ अंतर्गत प्रस्तावित क्रीडांगणाची अंमलबजावणी अद्यापही कागदावरच अडकून पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने दि. १२ डिसेंबर २०१२ रोजी मंजूर केलेला व २०१३ पासून अंमलात आलेला हा शासन निर्णय तब्बल १२ वर्षे उलटूनही राबविण्यात आलेला नसल्याचा आरोप सामाजिक नेते संजय काळे यांनी केला आहे.

कोपरगांव शहर हद्दीतील स.नं. ४५ पै., ४६, ४७ व ४८ पै. या एकूण ७.०८ हेक्टर क्षेत्रावर आरक्षण क्रमांक ९९ अंतर्गत क्रीडांगण विकसित करण्यास शासनाची मान्यता आहे. मात्र सदर भूखंड डेअरी, पोल्ट्री व ब्रीडिंग फार्मच्या मालकीचा असूनही तो सध्या पूर्णतः पडीत अवस्थेत असून नगरपरिषदेने याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.
साईबाबा कॉर्नर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२-जी लगत असलेला हा भूभाग शहराच्या अगदी जवळ असूनही सर्वसामान्य नागरिकांसाठी व्यायाम, फिरणे वा विरंगुळ्यासाठी एकही सुसज्ज क्रीडांगण गेल्या बारा वर्षांत उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. तसेच शहरातील शाळा व महाविद्यालयेही आपली क्रीडांगणे नागरिकांसाठी खुली करत नसल्याने युवक व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात पोहोचलेली असताना नागरिकांना क्रीडांगण उपलब्ध करून देणे हा शासनाचा स्पष्ट निर्णय असतानाही नगरपरिषदेची उदासीन भूमिका चिंताजनक असल्याचे संजय काळे यांनी नमूद केले. सदर भूखंड शासनाचाच असल्याने नगरपरिषदेने शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून आरक्षण क्रमांक ९९ अंतर्गत क्रीडांगण विकसित करावे, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर व मुख्याधिकारी, कोपरगांव नगरपरिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे त्यांनी सांगितले.




















