गृहनिर्माण व पुनर्विकास क्षेत्रातील सहकार्याची संधी तपासणी
मुंबई, दि. २७ : मंगेश म्हात्रे
जपान सरकारच्या अर्बन रिनेसान्स एजन्सी (UR) च्या ग्लोबल अफेअर्स विभागाच्या शिष्टमंडळाने आज मुंबईतील वांद्रे (पूर्व) म्हाडा मुख्यालयास भेट दिली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने म्हाडातर्फे राबविण्यात येणाऱ्या गृहनिर्माण, पुनर्विकास, क्लस्टर विकास तसेच ग्रोथ हब प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व संचालक ओकामुरा टोमोहीतो यांनी केले. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीद्वारे भारत आणि जपान या दोन्ही देशांदरम्यान परवडणाऱ्या दरातील गृहबांधणी व शहरी पुनर्विकास क्षेत्रातील भावी सहकार्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिष्टमंडळाला संबोधित करताना जयस्वाल म्हणाले, “म्हाडा ही परवडणाऱ्या दरातील गृहनिर्मिती करणारी देशातील अग्रगण्य संस्था असून, तिच्या पुनर्विकास प्रकल्पांमुळे मुंबईचे शहरी स्वरूप बदलत आहे. नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि सन्माननीय घरे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे १६,००० कुटुंबांना दोन बेडरूमची घरे विनामूल्य मिळणार आहेत. गोरेगावमधील मोतीलाल नगर प्रकल्प हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरणार असून सुमारे १,६०० चौरस फूट क्षेत्रफळाची घरे दिली जाणार आहेत. तसेच पंजाबी कॉलनी (जी.टी.बी. नगर), सिद्धार्थ नगर (पत्राचाळ), अभ्युदय नगर, पूनम नगर, आदर्श नगर, वरळी, आणि वांद्रे रिक्लेमेशन अशा अनेक प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण साठ्यात सहा लाख नवीन घरे जोडली जाण्याची अपेक्षा आहे.
शिष्टमंडळाने कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाबद्दल विशेष रस दाखविला. हा प्रकल्प शंभर वर्षांहून जुने आणि मोडकळीस आलेले परिसर नव्याने घडवून सुमारे ८,००० कुटुंबांना प्रत्येकी ५०० चौरस फुटांची मोफत घरे देणार आहे.
जयस्वाल यांनी म्हटले की, “म्हाडा ही भारताच्या शहरी परिवर्तनाची प्रमुख संस्था बनली असून, पुनर्विकास हा मुंबईतील गृहनिर्माण तुटवड्याचा प्रभावी उपाय ठरला आहे. जपानची अर्बन रिनेसान्स एजन्सी ही अनुभवी आणि शहरी नियोजनात अग्रगण्य संस्था आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक आणि सहकार्याच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.”
आपल्या समारोपात ओकामुरा टोमोहीतो यांनी महाराष्ट्र शासन आणि म्हाडा यांच्या स्मार्ट, समावेशक आणि सक्षम शहर उभारणीसाठीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी म्हाडाच्या परवडणाऱ्या गृहनिर्माण आणि पायाभूत विकास उपक्रमांचे अभिनंदन केले तसेच भारताच्या शहरी विकास उपक्रमांना जपानकडून सतत पाठिंबा दिला जाईल, अशी ग्वाही दिली.




















