कोपरगाव, दि.६ : दिलीप गायकवाड
कोपरगाव शहरालगतच्या टाकळी फाटा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात रस्तारोको आंदोलन छेडले.
ही घटना टाकळी फाटा जवळील ओढ्याच्या काठावर घडली. उसतोडीच्या कामासाठी आलेल्या मजुरांच्या झोपडीसमोर खेळत असताना बिबट्याने अचानक हल्ला करून बालिकेला उचलून नेले. नागरिकांच्या आरडाओरडीनंतर बिबट्याने बालिकेला सोडले, मात्र गंभीर जखमी अवस्थेत तिला वाचवता आले नाही.
घटनास्थळी कोपरगाव ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ दाखल झाले. रागावलेल्या ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर ठिय्या देत वनविभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मृत बालिकेचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
स्थानिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत कठोर कारवाईची मागणी केली आहे. “गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून येसगाव, जेऊर कुंभारी, डाऊच अशा गावांत जनावरांवर आणि आता माणसांवरही हल्ले वाढले आहेत. तरीही प्रशासन झोपेत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
वनविभागाने तत्काळ पिंजरे लावून बिबट्या पकडण्याची मागणी होत आहे. तसेच काटेरी झुडपे व लपण्याची ठिकाणे तातडीने साफ करावीत, आणि ग्रामीण भागातील मुलांना एकटे सोडू नये, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.




















