कोपरगाव, दि.६ : दिलीप गायकवाड
कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच शहरात स्वच्छ आणि सुंदर नगराचे स्वप्न दाखवणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र ही धडपड खरंच शहराच्या स्वच्छतेसाठी आहे की नगरपालिकेच्या तिजोरीसाठी, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून शहरात प्रशासकीय राज सुरू असताना, कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसतो. मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत कचऱ्याचे ढीग, बंदिस्त गटारी, आणि मोकाट जनावरांनी व्यापलेले रस्ते अशीच परिस्थिती कायम आहे.
राजकीय नेते आणि पक्षांचे कार्यकर्ते ‘सुंदर शहर, स्वच्छ शहर’चे स्वप्न दाखवत असले तरी प्रत्यक्षात स्वच्छता मोहिमेचा मागमूस नाही. औषध फवारणीही थांबली असून, शहरात नियमित स्वच्छता निरीक्षक नसल्याने नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद मिळत नाही.
“ज्यांनी कधी स्वच्छतेसाठी अर्जही दिला नाही, तेच आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता जनतेने मतपेटीतून खरी स्वच्छता घडवावी,” असे लोक स्वराज्य आंदोलनाचे ॲड. नितीन पोळ यांनी बहुजन शक्ती न्यूज’शी बोलतांना सांगितले.




















