ठाणे : अजय मगरे
ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने महायुतीच्या विजयाचे फाटक उघडले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हा विजय महायुतीच्या एकजुटीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या प्रत्येकी दोन उमेदवारांसह महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे सर्व १७ उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीत मतभेद आणि गटबाजी उघड झाली असून अनेक ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांची कमकुवत स्थिती समोर आल्याचा दावा शिंदे यांनी केला. राज्यात महायुती सरकारच्या विकासकामांमुळे जनतेचा विश्वास वाढला असून याच जोरावर आगामी निवडणुकांतही यश मिळेल, असे ते म्हणाले.
यावेळी नवनिर्वाचित आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.




















