सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश….
मुंबई, दि.१२ : अजय मगरे
रत्नागिरी जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर आणि आंबडवे परिसराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन टप्प्यात (पहिला व दुसरा) सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे स्पष्ट निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत या विषयावर चर्चा झाली. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, आयुक्त दीपा मुधोळकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह उपस्थित होते.
मंत्री शिरसाट म्हणाले की, ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या या ठिकाणाचा विकास तातडीने करण्याची आवश्यकता आहे. स्मारक बांधणीसह परिसर विकासासाठी ‘बार्टी’च्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमही सुरू करावेत. स्मारकासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावे. यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती स्थापन करून सर्व कामांचा आढावा त्या समितीपुढे सादर करावा.
याशिवाय स्मारक उभारणीसाठी निधीची तरतूद, वास्तुविशारद नेमणूक, प्रकल्पाच्या टप्प्यांची आखणी आणि मौजे आंबडवेतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सर्व कामांसाठी दोन टप्प्यात सविस्तर प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.




















