पैठण, दि.१८ : ( अभिजीत सोनवणे )
तालुक्यातील नांदर (प्राचीन नाव नंदीग्राम) येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवी शारदीय नवरात्र उत्सवाचा शुभारंभ दिनांक २२ सप्टेंबरपासून होत आहे. विरभद्रा नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण माहुरगडच्या रेणुका मातेस उपपीठ मानले जाते. स्वयंभू मूर्ती असलेले हे देवस्थान भाविकांच्या मोठ्या श्रद्धास्थानापैकी एक आहे.

या उत्सवात धार्मिक वातावरण भारून टाकणारे विविध कार्यक्रम राबवले जात असून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या अमृतवाणीतील देवी भागवत कथा भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक दर्शनासाठी नांदरला दाखल होणार असून मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, फळफराळाचे वाटप यांसारख्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
ग्रामदैवताच्या या नवरात्र सोहळ्यामुळे नांदर गावासह संपूर्ण परिसरात भक्तीचा माहोल निर्माण झाला असून शक्ती उपासनेचा उत्सव म्हणून भाविक मोठ्या उत्साहात सहभागी होणार आहेत.




















