बीड-परळी रेल्वे मार्गाला गती देण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. ३ : अजय मगरे
मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे अनेक दशके जुने स्वप्न अखेर साकार होणार आहे. रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर आता रेल्वेच्या नकाशावर दाखल होणार असून येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड ते अहिल्यानगर रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला जाणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गातील अडथळे तातडीने दूर करून गतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
बैठकीला महापारेषणचे महाव्यवस्थापक संजीव कुमार, सार्वजनिक बांधकाम सचिव दशपुते, सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए., उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, रेल्वे अधिकारी विनीत कुमार, पद्मसिंह जाधव, मिलिंद हिरवे, स्वप्नील नीला, प्रशांत भेगडे यांसह जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “बीड-परळी रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणे प्रशासनाने तातडीने निकाली काढावीत. राज्य शासनाचा हिस्सा त्वरित अदा करून अर्थसंकल्पात मंजूर १५० कोटी रुपये तातडीने वितरित करावेत. उर्वरित १५० कोटींची तरतूद पुढील टप्प्यात करावी,” असे निर्देश त्यांनी दिले. तसेच रेल्वेने दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यास सांगितले.
अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्प
एकूण लांबी : २६१.२५ कि.मी.
भूसंपादन : १८२२.१६८ हेक्टर
पूल : रेल्वेखालील १३०, रेल्वेवरील ६५
मोठे पूल : ६५, छोटे पूल : ३०२
प्रकल्पाची एकूण किंमत : ₹४८०५.१७ कोटी
केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा : ५०:५० प्रमाणात प्रत्येकी ₹२४०२.५९ कोटी
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या या रेल्वेसेवेने बीडकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार असून प्रदेशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




















