कोपरगाव, दि.१२.दिलीप गायकवाड
नगर–मनमाड महामार्गावर वाढत्या अपघातांच्या मालिकेविरोधात सामाजिक नेते विनय भगत यांनी प्रतीकात्मक दशक्रिया विधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. ‘माझा गाव माझा अभिमान’ या सामाजिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन मंगळवार, दि. १२ मार्च रोजी कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नर येथे शांततेत पार पडले.
नगर–मनमाड महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता ‘मृत्यूचा महामार्ग’ ठरत असल्याची तीव्र भावना व्यक्त करत विनय भगत यांनी या विरोधात प्रतीकात्मक दशक्रिया विधी करून शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी त्यांनी डोक्याचे केस काढून आंदोलन करत अपघातांच्या घटनांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध तसेच महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत भगत यांनी हे आंदोलन केले. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रत्येक चौफुलीवर, सिग्नल ,बसवावेत बायपास ठिकाणी ब्लिंकर दिशा दर्शक फलक शहरातील रस्त्यांवर रबरी स्पीड ब्रेकर ,अपघात स्पाॅट फलक लावावेत इत्यादी सुविधा तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनास स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आंदोलनाबाबत विनय भगत यांनी महाराष्ट्र शासन, संबंधित प्रशासन व प्राधिकरणांना निवेदन देऊन पूर्वसूचना दिली होती.



















