कोपरगाव, दि.९ ( दिलीप गायकवाड )
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागासवर्गीय शेतकऱ्यांकडील महार वतनी, इनाम व हाडके-हाढुळे जमिनी बळकावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. शासनाच्या परवानगीशिवाय या जमिनींची विक्री कायदेशीररीत्या होऊ नये, असा कायदा असताना देखील श्रीमंत जमीनदार, दलाल व राजकीय वर्चस्व गाजवणारे मंडळी दबावाच्या माध्यमातून या जमिनी बळकावतात. या प्रकारामुळे मागासवर्गीय शेतकरी हतबल होत असून त्यांचे जमिनीवरचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये महार समाजातील शेतकऱ्यांकडे पूर्वजांपासून वतन, इनाम किंवा हाडके-हाढुळे अशा जमिनी आहेत. ब्रिटिश कालखंडात व महाराजांच्या कारकिर्दीत मिळालेल्या या जमिनींवर आजही त्यांचे कुटुंब शेती करत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या समाजातील लोकांवर मोठ्या जमीनदारांकडून सातत्याने दबाव टाकून जमिनी विकायला भाग पाडले जात आहेत.
दबावाचं राजकारण, भितीचं वातावरण
गावात स्वतंत्रपणे जगू न देण्यासाठी सामाजिक बहिष्कार, कुटुंबात वाद निर्माण करणे, पोलीस व कोर्टाची भीती दाखवणे, मुलांना त्रास देणे, कागदपत्रांत फेरफार करून चुकीची नोंदणी करणे असे अनेक हत्थे वापरून जमिनी हडपल्या जात आहेत. काही कुटुंबांमधील एखादा सदस्य पैसे दाखवून फितूर केला जातो आणि संपूर्ण जमिन विकायला भाग पाडले जाते.
सरकारी यंत्रणेची भूमिका संशयास्पद
या गैरव्यवहारात महसूल खात्याचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, दलाल, बिल्डर, मठ-मंदिर व्यवस्थापन अशांची संलग्नता असल्याचा आरोप होत आहे. शासनाच्या परवानगीशिवाय या जमिनी विकल्या जाऊ शकत नाहीत, हे माहित असूनही पैसे आणि राजकीय दबावाच्या बळावर परवानगी मिळवली जाते.
सरकारकडे मागणी
महार समाजातील लोकांचा शेतीवरील हक्क टिकून राहावा, यासाठी आदिवासी जमिनींबाबत असलेल्या कायद्याप्रमाणे महार वतनी व इनाम जमिनींबाबतही नियम तयार करावेत, अशी मागणी होत आहे. या जमिनी विकायच्याच असतील, तर त्या समाजातीलच व्यक्तींना विकल्या जाव्यात, असे बंधन घालावे, अशी स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे.
आज या समाजातील अनेक कुटुंबं शेती सोडून स्थलांतरित होत आहेत. ‘‘यापुढेही हेच सुरू राहिलं, तर महार समाजातील शेतकरीच उरणार नाही,’’ अशी भिती व्यक्त होत आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष घालून कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे




















