मुंबई, दि. २८ : अजय मगरे
मूलभूत, मर्मभेदी, चिंतनशील, चिकित्सक, बुद्धिप्रामाण्यवादी, झुंझार आणि क्रांतिकारी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये होती. अस्पृश्य समाजाला नवा उच्चार आणि नवा उद्गार देण्याचे कार्य बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी केले. विचारसौदर्य हेच त्यांच्या पत्रकारितेचे प्राणतत्त्व होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि लेखक श्रीकांत जाधव यांनी केले.
‘डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत पत्रकारिता विषयावर ते बोरिवली (पूर्व) येथील हनुमान टेकडीवरील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४४८, महिला मंडळ आणि प्रबुद्ध सेवा संघ आयोजित वर्षावास मालिकेतील बाराव्या पुष्पप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सचित कांबळे होते. यावेळी नितीन शिर्के, नाता जाधव, प्रशांत जाधव, विजया जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
जाधव पुढे म्हणाले, भावी उन्नतीच्या दिशेची खरीखुरी चर्चा घडवून आणण्याचे कार्य वृत्तपत्रे करतात, अशी बाबासाहेबांची धारणा होती. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रांमधून बाबासाहेबांनी मूक समाजाला बोलते केले. मूकनायक ते प्रबुद्ध भारत हा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास म्हणजे त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाचा आरसा आहे. आजही या वृत्तपत्रांना प्रचंड महत्त्व आहे.
समाजस्थिती बदलण्याची प्रतिज्ञा या वृत्तपत्रांनी जणू अंगीकारली होती. अलंकारिक भाषेचा आधार न घेता विचारप्रधान शैलीतून बाबासाहेबांनी केलेले लेखन हे त्यांच्या ध्येयवादाचे द्योतक आहे. त्यांच्या प्रत्येक लेखातून कृतीशीलता आणि परिवर्तनाची जाणीव स्पष्ट होते, असेही जाधव म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्रिशरण, पंचशील व बुद्धधम्म ग्रंथाचे सामूहिक पठण करण्यात आले.




















