मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एल्गार
मुंबई, दि. १५ : अजय मगरे
महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरील बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी १७ सप्टेंबर रोजी देशव्यापी जनआक्रोश आंदोलन पेटणार आहे. या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर करणार असून मुंबईत आझाद मैदानावर भव्य जनसागर उसळणार आहे.
महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते अनागारिक धम्मपाल व पेरियार स्वामी जयंती तसेच भय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून हा दुसरा टप्पा राबवला जात आहे. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, बौद्ध भिक्खु संघ आणि आंबेडकरी विचाराच्या असंख्य संघटना-मंडळांच्या माध्यमातून हे
आंदोलन उभारण्यात आले आहे.
आंदोलनाच्या तीन प्रमुख मागण्या :—
१) बोधगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे द्यावे. बिहार सरकारच्या १९४९ च्या कायद्याने फक्त ४ बौद्ध सदस्यांचा समावेश हा असंवैधानिक असल्याचे स्पष्ट करून हा कायदा रद्द करावा व व्यवस्थापनात डॉ. भीमराव य. आंबेडकर यांचा कायम समावेश करावा……!
२) महू जन्मस्थळ स्मारकाचे व्यवस्थापन आंबेडकरी समाजाकडे द्यावे. मध्यप्रदेश सरकारने उभारलेले हे भव्य स्मारक बाबासाहेबांच्या विचारधारेला विरोधी पद्धतीने चालवले जात असल्याने ते त्वरित दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया/डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याकडे सोपवावे……!
३)नागपूर दीक्षाभूमीवरील बेकायदेशीर कब्जा दूर करून मूळ मालक दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कडे व्यवस्थापन द्यावे. पार्किंगच्या नावाखाली चाललेले विद्रूपीकरण तत्काळ थांबवावे……!
मुंबईत आझाद मैदानावर भव्य मोर्चा….
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर व रायगड जिल्ह्यांचा संयुक्त मोर्चा आझाद मैदानावर सकाळी १०.३० वाजता निघणार असून त्याचे नेतृत्व डॉ. भीमराव आंबेडकर स्वतः करतील. या मोर्च्यातून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या संदर्भात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाचे केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. एस. के. भंडारे यांनी माहिती देत सर्वांनी या अस्मितेच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.




















