मुंबई, दि.१६ (प्रतिनिधी)
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या दुर्घटनांमध्ये नागरिकांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन अशा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करावे, असे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत.
मुंबईतील अलीकडील लोकलमधून पडून झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांनी रेल्वे, मेट्रो, पोलीस, महापालिका आणि इतर प्रशासकीय यंत्रणांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना आणि संभाव्य धोके यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्य सचिव म्हणाल्या, “पावसाळा व सणासुदीच्या काळात सर्व यंत्रणांनी विशेष दक्षता बाळगावी. रेल्वे प्रशासनाने नोडल ऑफिसरची नेमणूक करून गरज असल्यास निवृत्त व तज्ज्ञ अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना तयार करून त्याचा प्रसार सोशल मीडिया, एफएम रेडिओ, अनाउन्समेंट सिस्टीम, डिस्प्ले बोर्ड यांच्या माध्यमातून करण्यात यावा. लोकलच्या दरवाजांना स्वयंचलित बंद होणारी यंत्रणा बसवावी व गर्दी वाढल्यास लिफ्टप्रमाणे सायरन वाजवण्याची व्यवस्था करावी.”
त्या पुढे म्हणाल्या की, दुर्घटनेनंतर चुकीची माहिती पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांना योग्य माहिती वेळेवर मिळावी यासाठी तातडीची कृती अपेक्षित आहे. रेल्वे स्थानकांवर बॅगेज स्कॅनर बसवणे, अनोळखी बॅगांची व कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावणे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुरक्षा अधिक बळकट करणे आवश्यक आहे.
या बैठकीला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण, महामुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर तसेच रेल्वे, महसूल, गृह, परिवहन, नगरविकास विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ब्रिजेश सिंह यांनी नागरिकांना आवश्यक ती माहिती योग्यवेळी आणि एकसारख्या माध्यमातून मिळावी यावर भर दिला. त्यांनी नागरिकांनी अधिक दक्ष राहावे, यासाठी संवेदनशील भागांमध्ये लक्ष केंद्रीत करून माहितीचा प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.




















