१२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किमी लांबीचा ऐतिहासिक द्रुतगती मार्ग; धार्मिक पर्यटनास मोठा चालना….
मुंबई, दि.२४ ( प्रतिनिधी )
राज्याच्या विकासदृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. नागपूरपासून गोवा सीमेसह सिंधुदुर्गातील पत्रादेवीपर्यंत जाणाऱ्या या महामार्गासाठी २० हजार ७८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणारा आणि पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे समाप्त होणारा हा महामार्ग ८०२.५९२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. तो वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांना जोडणारा ठरणार आहे.
या मार्गाचा पुढील टप्पा कोकण द्रुतगती मार्गाशी जोडला जाणार असून, यामुळे नागपूर ते गोवा हे सुमारे १८ तासांचे अंतर केवळ ८ तासांत पार करता येणार आहे. यामुळे वाहतूक सुलभ होणार असून, वेळ आणि इंधन वाचणार आहे.
हा महामार्ग माहूर, तुळजापूर, अंबेजोगाई, कोल्हापूर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, कारंजा-लाड, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर यांसारख्या महत्त्वाच्या शक्तीपीठांना आणि तीर्थक्षेत्रांना एकत्र जोडणारा असणार आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठा चालना मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी हुडकोकडून १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यातून ७,५०० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) केली जाणार आहे.
हा महामार्ग केवळ वाहतूक सुलभ करण्यासाठी नाही, तर धार्मिक, पर्यटन, आर्थिक आणि ग्रामीण विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. महाराष्ट्रातील विविध शक्तीपीठांना एकत्र जोडणारा हा प्रकल्प राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.




















