कोपरगांव,दि.२ : दिलीप गायकवाड
कोपरगांव तालुक्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन व्हावे, ही स्व. शंकरराव कोल्हे साहेबांची दूरदृष्टी होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे १९९३ साली कोपरगांव तहसील कार्यालयाच्या जवळ १०४० चौरस मीटरचा भूखंड पत्रकार भवनासाठी मिळवून देण्यात आला. त्यावेळी ते राज्याचे महसूल मंत्री होते. मात्र, या पत्रकार भवनाचे स्वप्न तीन दशकांनंतरही अपूर्णच राहिले आहे.त्यावेळचे ज्येष्ठ पत्रकार अध्यक्ष स.म.कुलकर्णी, सचिव अशोक खांबेकर, सुरेश रासकर यांच्या प्रयत्नाने हा भुखंड मिळाला अशी माहिती पत्रकार कचरु लोहकरे यांनी दिली.

१९९४ साली मा.महसूल मंत्री कोल्हे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली ९ लाखांची अनुदानाची रक्कम पत्रकार संघाच्या तत्कालीन कमिटीने मुदतठेवीत ठेवली, परंतु त्या रकमेचा उपयोग भूखंड ताब्यात घेण्यासाठी किंवा इमारत बांधण्यासाठी करण्यात आला नाही. उलटपक्षी, ही रक्कम २००७ सालापर्यंत वाढून २७ लाख झाली आणि नंतर संघाने इंदिरा पथ येथे एका दुमजली इमारतीसाठी १५ लाख रुपये खर्च करून ती विकत घेतली. या इमारतीस “कोपरगांव तालुका पत्रकार भवन” असे नाव न देता “माहूर” असे नामकरण करण्यात आले. विशेष म्हणजे काही काळ त्या इमारतीत शैक्षणिक क्लासेस चालवले जात होते. अशी माहिती कचरु लोहकरे यांनी दिली.

या इमारतीविषयी अनेक पत्रकार अनभिज्ञ होते. पत्रकार भवनासाठी मिळालेला भूखंड कोणाच्या घशात गेला? असा सवाल आता उपस्थित होतो आहे. याबाबत काँग्रेस सेल्सचे उपाध्यक्ष विजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली असून म्हटले आहे की, “३० वर्ष भाडे तत्वावर मिळालेला हा शासकीय भूखंड कुठे गेला, कोणाच्या नावे गेला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे.”
आज ३० वर्षांनंतरही कोपरगांव तालुक्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र, अधिकृत पत्रकार भवन नाही, हे दुर्दैव आहे. कोल्हे साहेबांच्या स्वप्नाला आणि त्यांच्या प्रयत्नांना हरताळ फासणाऱ्या या प्रकरणाची शासन आणि प्रशासनाकडून चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी पत्रकारांकडून होत आहे.
प्रमुख मुद्दे:
१०४० चौ. मी. भूखंड १९९३ साली पत्रकार भवनासाठी मंजूर
९ लाख अनुदानाचा उपयोग न करता बँकेत ठेव
पुढे १५ लाखात ‘माहूर’ इमारत विकत घेतली…
‘पत्रकार भवन’ नव्हे तर शैक्षणिक वापर…
भूखंडाचा हिशोब अद्यापही अस्पष्ट…
काँग्रेस सेल्सकडून चौकशीची मागणी…




















