कोपरगाव, दि. ९ : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमधील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र मिळत नसल्याने ते विविध सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत.
७० वर्षीय शेतकरी दिपक कचेश्वर लोहकणे यांनी या संदर्भात तहसील कार्यालय, निवासी नायब तहसीलदार प्रफुल्ला सातपुते, महसूल तहसीलदार चंद्रशेखर कुलथे तसेच संजय गांधी योजना कार्यालयात चौकशी केली असता, सध्या हे ओळखपत्र देण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. सेतू केंद्रातही तपासणी केली असता ते बंद असल्याची माहिती देण्यात आली व आधारकार्ड वापरण्याचा सल्ला देण्यात आला.
लोहकणे यांच्यासह गणपत जनार्दन रक्ताटे, रामदास कारभारी वादे, शंकर गणपत रवंदकर आदी ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, पूर्वी मिळणारे हे ओळखपत्र अनेक शासकीय योजनांसाठी अत्यावश्यक आहे. विशेषत: केंद्र सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी याची गरज भासते. मात्र, आता हे कार्ड का बंद झाले याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिक संभ्रमात आहेत.
“जर सरकारने हे ओळखपत्र देणे बंद केले नसेल, तर कोपरगाव तालुक्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना हे कार्ड तातडीने मिळाले पाहिजे,” अशी मागणी या ज्येष्ठ नागरिकांनी केली असून, लवकरच यासाठी तीव्र पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळत नसल्याने वृद्धांना लाभ घेण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे लवकरात लवकर कार्ड वितरण पुन्हा सुरू करण्याची मागणी बहुजन शक्ती सामाजिक संस्थे कडून होत आहे.





















