मुख्यमंत्री फडणवीसांचा बीडीडी वासियांना सल्ला……
मुंबई, दि.१४ : मंगेश म्हात्रे
आशियातील सर्वात मोठा नागरी पुनर्विकास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वरळी येथील दोन पुनर्वसन इमारतीतील एकूण ५५६ पात्र कुटुंबांना आज नवीन घरांच्या चाव्या वाटप करण्यात आल्या. माटुंगा पश्चिम येथील यशवंत नाट्य मंदिरात झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घरवाटपाचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची टू बीएचके, अत्याधुनिक सोयींनी युक्त, मालकी तत्त्वावरील विनामूल्य सदनिका हे सोन्याहून मौल्यवान घर आहे. हे वारसा म्हणून जपावे, विकू नये.” शासनाने थेट म्हाडामार्फत प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतल्याने पारदर्शकता आणि गुणवत्तेचे नवे उदाहरण घालून दिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला “गुणवत्तापूर्ण पुनर्विकासाचा नवा आदर्श” असे संबोधले. “सेलेबल कंपोनंट” प्रमाणेच उच्च दर्जाची गुणवत्ता थेट रहिवाशांच्या घरांसाठी राखण्यात आली असून, इमारती पुढील १०० वर्षे टिकाव्यात यासाठी उत्कृष्ट साहित्याचा वापर केला आहे,* असे त्यांनी सांगितले. तसेच, घरांचा मालकीहक्क महिलांच्या नावे देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असेही त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चावी मिळालेल्या रहिवाशांच्या आनंदाचे वर्णन करताना बीडीडी चाळींच्या सामाजिक व सांस्कृतिक वारशाचा उल्लेख केला. “१६० चौ.फु. घरातून ५०० चौ.फु. सुसज्ज घरात स्थलांतर हा भावनिक क्षण आहे,” असे ते म्हणाले.
वरळी बीडीडी प्रकल्पात ४० मजल्यांच्या ३४ पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यातील डी व ई विंगमधील ५५६ सदनिका आज वितरित झाल्या असून, उर्वरित टप्पे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहेत. प्रकल्पांतर्गत १२१ जुन्या चाळींतील ९,६८९ रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे.
जागेचा ६५% भाग पुनर्वसनासाठी वापरला गेला असून, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. इमारतींची १२ वर्षे देखभाल म्हाडा करणार असून, जांबोरी मैदान व आंबेडकर मैदान कायम राखले जाणार आहे. तसेच जुन्या इमारतींचे संग्रहालय बनवून बीडीडी चाळींचा इतिहास जतन करण्याची योजना आहे.
धारावी पुनर्विकासालाही गती
मुख्यमंत्री फडणवीस यांनी धारावी पुनर्विकासाबाबत सांगितले की, १० लाखांहून अधिक लोकसंख्येचा हा परिसर ‘नवीन शहर’ म्हणून उभारला जाणार आहे. सर्व पात्र रहिवाशांना घर मिळेल तसेच ५ वर्षे करसवलत दिली जाईल.
कार्यक्रमाला मंत्री मंगल प्रभात लोढा, ॲड. आशिष शेलार, डॉ. पंकज भोयर, खासदार मिलिंद देवरा, आमदार सचिन अहिर, कालिदास कोळंबकर, महेश सावंत, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते




















