३० नोव्हेंबरपर्यंत अपॉईंटमेंट घेतल्यास कारवाईतून सूट;
१ डिसेंबरपासून नियमभंगावर दंडात्मक कारवाई
मुंबई, दि.१४ : अजय मगरे
राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्याची अंतिम मुदत वाढवून आता ३० नोव्हेंबर २०२५पर्यंत केली आहे. यापूर्वी ही मुदत १५ ऑगस्ट २०२५ होती, परंतु वाहनमालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
सर्व जुन्या वाहनमालकांनी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ३० नोव्हेंबरपर्यंत अपॉईंटमेंट घेऊन एचएसआरपी पाटी बसवावी. मुदत संपल्यानंतर, म्हणजेच १ डिसेंबर २०२५पासून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई होणार आहे.
तथापि, ३० नोव्हेंबरपर्यंत अपॉईंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी स्पष्ट केले. तसेच, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनधारकांनी तातडीने एचएसआरपी पाटी बसवून नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी आवाहन केले.




















