मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.२६ : अजय मगरे
मराठवाड्याच्या प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी दळणवळण सुविधांची उभारणी हे सरकारचे प्राधान्य आहे. “नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस मुळे मराठवाड्याला मुंबईशी अधिक वेगवान जोडणी मिळाली असून, या गाडीमुळे मराठवाड्याच्या समृद्धीचे नवे द्वार खुले झाले आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
नांदेड रेल्वे स्थानकावरून ‘नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस’ ला मंत्रालयातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी मंत्रालयात आयोजित कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश कुमार पांडे, विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेला नवे रूप लाभत आहे. प्रगत देशांप्रमाणे वेगवान, आरामदायी आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ‘वंदे भारत’ ही त्याची साक्ष आहे. नांदेड–मुंबई दरम्यान ६१० किलोमीटरचा प्रवास केवळ ९ ते ९.३० तासांत पूर्ण होणार असून, पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. गाडीची क्षमता ५०० वरून १४४० इतकी वाढली असून डबे ८ वरून २० करण्यात आले आहेत.”
नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना जलद व आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदन करीत सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
नांदेड येथील कार्यक्रमास खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड परिशेत्राचे पोलिस उपमहनिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डीएमआर प्रदीप कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये : मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस.
६१० कि.मी. अंतर फक्त ९ तास ३० मिनिटांत पूर्ण; इतर गाड्यांच्या तुलनेत वेळेत मोठी बचत.
आठवड्यातून सहा दिवस सेवा – नांदेडहून बुधवार व मुंबईहून गुरुवार वगळता दररोज धावणार.
व्यापारी, अधिकारी, भाविक तसेच नियमित प्रवासी यांच्यासाठी सोयीची सुविधा.
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वातानुकूलित, आरामदायी व सुरक्षित प्रवास.




















