चैत्यभूमीकडे जाताना रिक्षा तीन तास अडवून ठेवल्याचा आरोप
मुंबई, दि.६ : मंगेश म्हात्रे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी रिक्षाने चैत्यभूमीकडे निघालेल्या भीम अनुयायांना सायन चुनाभट्टी आणि माहिम परिसरात पोलिसांनी तब्बल तीन तास अडवून ठेवल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.
या प्रकारामुळे अनुयायांमध्ये तीव्र नाराजी उसळली असून,“डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात असताना आम्हाला अडवणे—अशी दबंगगिरी सहन करण्यासारखी नाही,” असा संतप्त स्वर अनुयायांनी व्यक्त केला.
सामाजिक कार्यकर्ते मधु रणदिवे यांच्या म्हणण्यानुसार, मार्ग मोकळा असूनही पोलिसांनी कोणतेही स्पष्ट कारण न देता रिक्षा थांबवून विचारपूस केली व त्यांना दीर्घकाळ रोखून धरले. महापरिनिर्वाण दिनी वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या पद्धतीचे वर्तन धक्कादायक आहे.
“आम्ही दरवर्षी कुटुंबासह रिक्षाने येतो… मग यंदाच का आम्हाला अडविण्यात आले?” असा सवालही काही अनुयायांनी उपस्थित केला.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी भीम अनुयायांकडून करण्यात आली आहे.




















