कोपरगाव : दि. २५ ,दिलीप गायकवाड
राज्यातील शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफीची अत्यंत गरज असून कर्जमाफी करताना थकीत कर्जदारांसोबत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा, अशी मागणी आमदार आशुतोषदादा काळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आर्थिक सल्लागार तथा शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष प्रविणजी परदेशी यांना निवेदन सादर केले.
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत अभ्यास करण्यासाठी समिती नेमली असून समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडतानाच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, असे काळे यांनी स्पष्ट केले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळत नसल्याने त्यांच्या मनात
अन्यायाची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे शासनाने थकीत कर्जदारांना जेवढी कर्जमाफी दिली जाईल, तेवढ्याच रकमेचे प्रोत्साहनपर अनुदान नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही देण्यात यावे, अशी स्पष्ट नोंद समितीच्या अहवालात करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांमध्ये समतोल व न्यायाची भावना निर्माण होण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचेही काळे यांनी निवेदनात म्हटल आहे.याबाबत सुनिल गाडे चासनळी कोपरगांव यांनी बहुजन शक्ती न्युज कडे माहिती दिली




















