शुद्ध पाण्यासाठी आर.ओ. प्लांटचा लाभ
ठाणे,दि.२०.( अजय मगरे )
ओवळा–माजिवडा विधानसभा क्षेत्रातील लोकमान्यनगर विभागात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचे लोकार्पण आज उत्साहात पार पडले. साईनाथ मित्र मंडळ (ठा.म.पा. शाळा क्र. ४६ जवळ, पाडा नं. २), लोकमान्य नगर पाडा क्र. १ तसेच उन्नती पाण्याची टाकी, शिवाई नगर येथे हे उपक्रम राबविण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत विहिरींची स्वच्छता, दुरुस्ती, गाळ काढणे, पाणीसाठा वाढविणे तसेच पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच आर.ओ. प्लांट उभारण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.
वाढते शहरीकरण आणि घटती भूजल पातळी लक्षात घेता अशा प्रकारचे उपक्रम काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यास या प्रकल्पामुळे मदत होणार असून, टँकरवरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना वर्षभर पाण्याचा स्थिर पुरवठा मिळणार असून, पर्यावरण संवर्धन व जलसंधारणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भविष्यात अशा उपक्रमांमुळे परिसर अधिक जलसमृद्ध व स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना ठाणे शहर प्रमुख व नगरसेवक राजेंद्र पाठक, राकेश शिंदे, नगरसेविका शीतल ढमाले, सुलेखा चव्हाण, जयश्री डेव्हिड, शिवसेना विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभागप्रमुख भगवान देवकते, रामचंद्र गुरव, संतोष धमाले, देवेंद्र साळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















