मुंबई (प्रतिनिधी)
अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका महिलेच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका प्रसिद्ध मंदिराच्या पुजाऱ्याचाही समावेश असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २३ मार्च २०२६ ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली. पीडित महिला आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना आरोपींनी संगनमताने तिला लक्ष्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बिंदू शर्मा, निलम गुप्ता, सत्यप्रकाश दुबे, मुन्ना ऊर्फ सोनार, लीना कपूर, सुजाता विश्वास आणि एक अज्ञात व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित आरोपींनी पीडित महिलेला बेदम मारहाण केली तसेच तिचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ७४ (विनयभंग), कलम ७९ (लैंगिक छळ), कलम ११५(२) (स्वेच्छेने दुखापत), कलम ३५१(२) (गुन्हेगारी धमकी), कलम ३५२ (मारहाण) तसेच कलम ३(२) (सामूहिक गुन्हा) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आरोपींपैकी सत्यप्रकाश दुबे हा अंधेरीतील एका प्रसिद्ध हनुमान मंदिराचा पुजारी असल्याची माहिती समोर आली आहे. धार्मिक पदावर असलेल्या व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग असल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विविध महिला संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, संबंधित पुजाऱ्याला पदावरून हटविण्याची मागणीही पुढे येत आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.




















