ठाणे : प्रतिनिधी
ठाण्यात प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने अंबिका नगरातील ‘ प्रज्ञा फाऊंडेशन ‘ कार्यालयात मोठ्या उत्साहात बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचे स्मरण करत उपस्थितांनी शांतता, समता, करुणा आणि बंधुभावाचा संदेश समाजात रुजवण्याचा संकल्प केला.
भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून बौद्ध वंदना घेण्यात आली. तसेच अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करून भगवान बुद्धांना अभिवादन करण्यात आले.
या बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष तुळशीराम मगरे,ज्येष्ठ नेते सुखदेव ऊबाळे, यांच्यासह बाबासाहेब साबळे, सिद्धार्थ मोरे,अंकुश पोटफोडे, गोरख साबळे, सुशांत साबळे, उमेश जाधव, सुशील शरणांगत, शुभम वारे, सुरेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी भगवान बुद्ध यांच्या समता, शांतता, करुणा आणि बंधुभावाच्या विचारांचे स्मरण केले. समाजात सामाजिक ऐक्य निर्माण होण्यासाठी आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी बुद्धांच्या शिकवणीचे महत्त्व आजही कायम असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान धम्म संदेश देण्यात आला. तसेच युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन बुद्धांच्या विचारांचा प्रसार करावा, असे आवाहन करण्यात आले. बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.


















