नाशिक:प्रतिनिधी
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत झालेला कथित छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणाने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणातील पाच मुख्य संशयितांच्या जामीन अर्जावर नाशिक सत्र न्यायालयात (Session Court) गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सुनावणीचा निकाल आज लागला असून, न्यायालयाने सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
न्यायालयात काय घडले?
या प्रकरणातील पाच संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारी पक्षाने आरोपींच्या कृत्याचे गांभीर्य आणि तपासावर होणारा परिणाम याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. दोन्ही बाजूंचे मुद्दे विचारात घेतल्यानंतर, न्यायालयाने आरोपींना जामीन देण्यास नकार दिला.
कोणाचे अर्ज फेटाळले?
न्यायालयाने खालील पाच संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत:
• अखिनी चेनानी
• रजा मेनन
• आसिफ अन्सारी
• शाहरुख कुरेशी
• तौसिफ अत्तर
प्रकरणाची पार्श्वभूमी
नाशिकमधील TCS कंपनीत कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांचा छळ करण्यात आला तसेच त्यांच्या धार्मिक भावना दुखावून धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या संशयितांवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाचही जणांना अटक केली होती.
सध्या हे पाचही आरोपी नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये आहेत. जामीन फेटाळल्या गेल्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम आता वाढला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




















