समता संघर्ष विचार मंचतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात
मुंबई, प्रतिनिधी :
“कमी टक्के मिळाले म्हणून कधीही निराश होऊ नका. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असतील तर यश नक्की मिळते. एक ‘१२ फेल’ विद्यार्थीही आयपीएस अधिकारी होऊ शकतो, मग तुम्ही का नाही? आपले ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने प्रामाणिकपणे अभ्यास करा,” असे प्रेरणादायी आवाहन नगरसेविका हर्षलाताई मोरे यांनी विद्यार्थ्यांना केले.
समता संघर्ष विचार मंचतर्फे माटुंगा लेबर कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मार्च २०२६ च्या परीक्षेत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विष्णू भंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपले ध्येय निश्चित करून योग्य दिशा निवडा. सोशल मीडियाच्या युगात पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनीही आई-वडिलांना मित्र मानून त्यांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करावा.”
कार्यक्रमात डॉ. नंदकिशोर सावंत यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाची आठवण सांगितली. “१९८७ मध्ये मी माटुंगा लेबर कॅम्पमधील पहिला डॉक्टर झालो. जिद्द, मेहनत आणि पालकांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला तर प्रत्येक विद्यार्थी आपले ध्येय साध्य करू शकतो,” असे त्यांनी सांगितले.
समता संघर्ष विचार मंचाचे संघटक अनिल भंडारे यांनी माटुंगा लेबर कॅम्प हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असल्याचे सांगत, “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या विचारातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम मंच सातत्याने करत असल्याचे नमूद केले.
मंचाचे अध्यक्ष गणेश सवने यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा मर्यादित वापर करून शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर पुढे जा, कोणतीही अडचण आल्यास समता संघर्ष विचार मंच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमास डॉ. आदर्श सिंग, युनिकचे सलमान आझाद, सिने जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे, सुरेश सावंत, मिलिंद काळे, भाई गणेश बच्चाव, दिलीप कांबळे, अजय देठे, युवराज सरतापे, प्रकाश लांडगे, बाबा लोंढे, संजय भालेराव, विशाल निरभवने, निलेश गांगुर्डे, आर. वाय. कांबळे, सुहास काटे, बिपीन सोहनी, दिलीप सोहनी, धर्मेश निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नागरिक, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा गुणगौरव सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.




















