घाटकोपर आणि दादरनंतर आता गिरगावातही ‘पांढऱ्या पट्ट्यां’वरून वाद चिघळताना दिसत आहे. गिरगावातील मंगळवाडी परिसरात पांढऱ्या पट्ट्या आखण्याचं काम सुरू असताना ‘आम्ही गिरगावकर’ या स्थानिक संघटनेने त्याला विरोध दर्शवत हे काम थांबवलं. या प्रकाराविरोधात स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दुसरीकडे, दक्षिण मुंबईतील चर्नी रोड परिसरातील फुटपाथवरही अशाच प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या आखण्यात आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. बेने डोसा रेस्टॉरंटसमोरील फुटपाथवर या पट्ट्या दिसून आल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी एकत्र येत रात्रीच्या सुमारास या पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग लावून आपला विरोध दर्शवल्याची माहिती समोर आली आहे.
पट्ट्यांचं काम थांबवलं! ‘आम्ही गिरगावकर’चा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत
गिरगाव मंगळवाडी परिसरात पांढऱ्या पट्ट्या आखण्याचं काम थांबवण्यात आल्याचा व्हिडिओही ‘आम्ही गिरगावकर’ या स्थानिक संघटनेने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, जैन समुदायाकडून या पांढऱ्या पट्ट्या त्यांच्या धार्मिक चालीरीती आणि अहिंसेच्या संकल्पनेचा भाग असल्याचा दावा केला जात आहे. जैन साधू-साध्वी अनवाणी चालत असल्याने त्यांच्या पायाखाली कीटक किंवा सूक्ष्म जीव चिरडले जाऊ नयेत, यासाठी अशा पट्ट्या आखल्या जात असल्याचे सांगितले जाते.
मात्र, सार्वजनिक रस्ते आणि फुटपाथवर धार्मिक कारणांसाठी अशा प्रकारे पट्ट्या आखणे योग्य नाही, अशी भूमिका काही स्थानिकांकडून मांडली जात आहे. त्यामुळे घाटकोपर आणि दादरनंतर आता गिरगावातील या घटनेमुळे पांढऱ्या पट्ट्यांचा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
याआधी दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांचा प्रकार समोर आल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही आक्रमक भूमिका घेत या प्रकाराला “सांस्कृतिक दहशतवाद” असे संबोधले होते. आता गिरगावातील घडामोडींनंतर या वादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















