प्रकरण FDA आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडे वर्ग; ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा
कोपरगाव | प्रतिनिधी
तंबाखूच्या पुड्यांवर पंढरपूर, ‘ओम’ आणि ‘गाय’ यांसारख्या धार्मिक व सामाजिक प्रतीकांचा व्यावसायिक वापर करून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करत ‘माझा गाव माझा अभिमान’ संघटनेने कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास स्थगित केले आहे.
संघटनेचे विनय सुभाषराव भगत, विजय जाधव, अमित आढाव, मयूर आव्हाड, लक्ष्मण सताळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी २३ जुलैपासून आंदोलन सुरू केले होते. ‘ओम पंढरपुरी तंबाखू’ आणि ‘गायछाप तंबाखू’ या उत्पादनांवरील धार्मिक प्रतीकांचा व्यावसायिक वापर तातडीने बंद करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती.
आंदोलनाची दखल घेत कोपरगावचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी संघटनेला लेखी पत्र देत, १६ जुलै रोजी सादर केलेल्या निवेदन व पुराव्यांच्या आधारे हे प्रकरण पुढील कारवाईसाठी जिल्हा अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि ट्रेडमार्क कार्यालय, मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने प्रकरण सक्षम प्राधिकरणाकडे पाठवून कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या विनंतीचा मान राखत आंदोलन आणि आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, संबंधित तंबाखू कंपन्यांवर ठोस आणि अंतिम कारवाई न झाल्यास यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ‘माझा गाव माझा अभिमान’ संघटनेने दिला आहे.



















