सेन्सॉर बोर्ड बरखास्तीची मागणी – ‘कोण नामदेव ढसाळ?’ या वक्तव्यावर संतापाची लाट..
मुंबई, ४ मार्च (प्रतिनिधी) – ‘चल हल्ला बोल’ या मराठी चित्रपटातून महाकवी नामदेव ढसाळ यांची प्रसिद्ध कविता ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो…’ काढण्याचे सेन्सॉर बोर्डाने आदेश दिल्यामुळे जनसामान्यात तीव्र संताप उसळला आहे. विशेषतः “कोण नामदेव ढसाळ?” असा प्रश्न विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, सेन्सॉर बोर्ड बरखास्त करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
सोमवार, ३ मार्च रोजी लोकांचा सिनेमा चळवळ, दलित पँथर, लोकांचे दोस्त, कष्टकरी शेतकरी संघटना, चर्मकार समाज, मातंग प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, भारतीय महिला फेडरेशन यांसारख्या विविध संघटनांनी दादर (पूर्व) स्थानकाबाहेर तीव्र निदर्शने केली. आंदोलनाला जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
‘चल हल्ला बोल’वर सेन्सॉर बोर्डाची कात्री…..
महेश बनसोडे यांच्या दिग्दर्शनाखाली लोकवर्गणीतून तयार झालेल्या ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटात दलित पँथर, युक्रांद आणि बहुजनांच्या संघर्षाची कथा मांडण्यात आली आहे. मात्र, सेन्सॉर बोर्डाने तब्बल ११ कट लावण्याचे निर्देश दिले असून, चित्रपटाला प्रमाणपत्र नाकारले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे म्हणाले,
“बोर्डाने नामदेव ढसाळ यांची कविता वगळण्याचे लेखी आदेश दिले. आम्ही याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, त्यांनी ‘कोण नामदेव ढसाळ?’ असा उर्मट सवाल केला. ही प्रतिक्रिया अवमानकारक असून, त्यामुळे बहुजन समाजात संतापाची लाट उसळली आहे.”
सेन्सॉर बोर्ड बहुजन संस्कृतीवर बंदी घालतोय – रवी भिलाणे
लोकांचे दोस्त संघटनेचे रवि भिलाणे यांनी स्पष्ट केले की,
“सेन्सॉर बोर्ड जाणून-बुजून बहुजन संस्कृती आणि अभिव्यक्तीवर गदा आणत आहे. त्यामुळे आम्ही सेन्सॉर बोर्डविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे.”
या आंदोलनाला लोकशाहीर संभाजी भगत, डॉ. स्वप्नील ढसाळ, संगीता ढसाळ, पँथर सुमेध जाधव, कॉम्रेड सुबोध मोरे, ज्योती बडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे, कष्टकरी नेते विठ्ठलभाऊ लाड, काँग्रेसचे युवराज मोहिते, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा पाठिंबा मिळाला आहे.
सेन्सॉर बोर्डची गरज आहे का? – लोकांचा सवाल
या प्रकरणानंतर, सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात राहण्याची गरजच काय? असा प्रश्न आता लोकांच्या सिनेमाच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीचा विरोध करत, आंदोलनकर्त्यांनी “चल हल्ला बोल” असा थेट इशारा दिला आहे.




















