धारावीकरांच्या आंदोलनापुढे महापालिका झुकली
महापालिकेने अदानीसाठी घेतलेला निर्णय केला रद्द
मुंबई दि.४ मार्च ( प्रतिनिधी )
धारावीतील म्युनिसिपल चाळी आणि इमारतींच्या हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात महापालिकेने अदानीसाठी घेतलेल्या निर्णयाचा तीव्र विरोध झाल्यानंतर अखेर मनपाला हे पत्रक रद्द करावे लागले आहे. यामुळे धारावीकरांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.
महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अखत्यारीतील सर्व जमिनी आणि त्यावरील बांधकामे डीआरपीच्या माध्यमातून अदानीकडे सोपवण्याचा निर्णय पालिकेच्या जी / उत्तर विभागाने घेतला होता. याबाबत ६ फेब्रुवारी रोजी परिपत्रक जारी करण्यात आले होते. या निर्णयामुळे माटुंगा लेबर कॅम्प, शाहू नगर आणि अशा इतर म्युनिसिपल चाळी व इमारतीतील रहिवाशांना त्यांच्या खोलीच्या हस्तांतरणासाठी डीआरपीकडे जावे लागणार होते. यापूर्वी झालेली हस्तांतरण प्रकरणे पूर्ववत करण्याच्या या निर्णयामुळे धारावीतील रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.
या विषयी धारावी बचाव आंदोलनाने या निर्णयाचा तीव्र विरोध केला. “धारावीकरांना अदानीकडे शरणागत करण्याचा निंदनीय प्रकार” असे संबोधीत धारावीकरांनी जन आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या शिष्टमंडळाने सहाय्यक मनपा आयुक्त (जी/उत्तर विभाग) यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. हे अन्यायकारक पत्रक त्वरित मागे घेण्याची मागणी करत, हजारो धारावीकरांनी दादर येथील मनपा कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली होती.
या तीव्र आंदोलनाची दखल घेत अखेर महापालिका प्रशासनाने आपला निर्णय मागे घेत, संबंधित पत्रक रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. अशी माहिती “बहुजन शक्ती” न्यूज पोर्टला धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. राजेन्द्र कोरडे यांनी दिली.




















