अजितदादा विमान दुर्घटनेत मोठी कारवाई! DGCA ची VSR कंपनीवर देशव्यापी उड्डाणबंदी
अजितदादा यांच्या विमान दुर्घटनेनंतर अखेर मोठी प्रशासकीय हालचाल झाली असून नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उड्डाणांवर देशभरात बंदी घातली आहे. DGCA च्या सखोल ऑडिटमध्ये कंपनीच्या विमानांमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी आढळल्याचे समोर आले आहे.
तपासानंतर DGCA ने कंपनीच्या सर्व लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना स्थगिती दिली असून VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI या चार विमानांवर थेट उड्डाणबंदी लागू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे विमान सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी या दुर्घटनेबाबत सुरुवातीपासूनच घातपाताचा संशय व्यक्त करत मुंबई आणि दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. संबंधित विमान आणि कंपनीच्या कामकाजावर त्यांनी बोट ठेवले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर DGCA ची ही मोठी कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अजितदादा यांच्या मृत्यूमागे केवळ अपघात होता की काहीतरी वेगळं, हा प्रश्न आता अधिकच गडद झाला आहे. DGCA च्या पुढील तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




















