म्हाडा कोंकण मंडळातर्फे १६ मे रोजी दुसऱ्या जनता दरबार दिनाचे आयोजन…
मुंबई,दि.१३ ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोंकण मंडळातर्फे नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ आणि न्याय्य उपाय मिळावा यासाठी दुसऱ्या जनता दरबार दिनाचे आयोजन शुक्रवार, १६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. हा उपक्रम वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात पार पडणार आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार आणि राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या आराखड्यात “नागरिकांच्या तक्रारींचे निवारण” हा महत्त्वपूर्ण घटक असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागीय मंडळांना जनता दरबार आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोंकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली हा जनता दरबार होणार असून नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात १६ मेच्या सकाळी ११ वाजेपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन मंडळाने केले आहे.
या उपक्रमामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या अडचणींबाबत थेट मंडळाशी संवाद साधावा, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.




















