मुंबई -मंगेश म्हात्रे
अशोक खरात प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत महाराष्ट्रातील सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. खरात प्रकरणातील धक्कादायक तपशील वाचून “गरगरल्यासारखं झालं” असल्याचे सांगत त्यांनी या घटनेला महाराष्ट्राच्या अधःपतनाचे द्योतक म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, संतांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशा प्रकारचे प्रकार घडणे अत्यंत लज्जास्पद आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या विचारवंतांनी घडवलेल्या समाजमनाला आज अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीने ग्रासल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे करणारेच काही लोक आज अशा प्रकरणात अडकले असल्याचा विरोधाभास त्यांनी अधोरेखित केला. “राजकारण्यांच्या आशीर्वादाने अशोक खरातसारखे लोक बळावतात, ही अत्यंत भीषण बाब आहे,” असे ते म्हणाले.
या प्रकरणात महिलांचे शोषण होत असल्याचा आरोप करत त्यांनी याकडे अत्यंत गंभीर गुन्हा म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली. राजकीय सत्तेसाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे समाजातील मूल्यांचा ऱ्हास होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्याचा दावा केला असला तरी, इतक्या काळ हे प्रकार सुरू असताना सरकारला याची माहिती का मिळाली नाही, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणाचा वापर राजकीय हेतूसाठी होत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
माध्यमांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा पाठपुरावा थांबवू नये आणि दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत हा मुद्दा जिवंत ठेवावा.
राज्यात महिलांवरील अत्याचार, अपहरण आणि ड्रग्सचा वाढता प्रभाव याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. “दैवी शक्तीच्या नावाखाली स्त्रियांचं शोषण होत असेल, तर यापेक्षा गंभीर काहीच नाही,” असे ते म्हणाले.
शेवटी, या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, अन्यथा संत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.




















