मोर्च्यानंतर प्रशासनाचे आश्वासन; प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाईची तयारी
मुंबई : मंगेश म्हात्रे
वरळी नाका परिसरातील प्रेम नगर आणि सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्प गेल्या तब्बल २५ वर्षांपासून रखडल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि बहुजन शक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आज रहिवाशांनी एसआरए कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निषेध नोंदवला.
मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाशी बैठक घेत निवेदन सादर केले. बैठकीत प्रकल्प रखडविण्यास कारणीभूत ठरलेल्या विकासकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे विशेष अधिकारी श्री. मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि संबंधित विकासकावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, विकासकाने ५७ रहिवाशांना भाडे न दिल्याचा गंभीर मुद्दाही उपस्थित करण्यात आला. सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवारयांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला होता; मात्र तो धनादेश बाऊन्स झाल्याची माहिती समोर आली. यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रहिवाशांनी प्रशासनाकडे प्रकल्पासाठी ठोस कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करण्याची, तसेच अपयशी ठरलेल्या विकासकाची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात कॉ. शैलेंद्र कांबळे, मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार, बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी, नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते.




















