आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा
मुंबई : प्रतिनिधी
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता रस्त्यावर उतरला असून, आर्थिक, मानसिक आणि व्यावसायिक असुरक्षिततेविरोधात देशभर आंदोलनाची ठिणगी पडली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथे आंदोलन छेडण्यात आले आहे.
मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. “वर्षानुवर्षे सेवा देऊनही स्थैर्य नाही, वेतनाबाबत स्पष्टता नाही आणि भवितव्य अंधारात ढकलले जात आहे,” अशी तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनाला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) ने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटना रस्त्यावर उतरली असून, केंद्र सरकार आणि व्यवस्थापनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनस्थळी सिटूचे मुंबई जिल्हा सचिव कॉम्रेड शैलेंद्र चौहान, एफएसयूआयचे अखिल भारतीय महासचिव कॉम्रेड मनोज यादव तसेच सिटू महाराष्ट्र जनरल कौन्सिल सदस्य कॉम्रेड शैलेंद्र कांबळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा देत, “कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशारा दिला.
दरम्यान, देशभरातील हजारो FTE कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिल्याने एअर इंडिया व्यवस्थापनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.




















