जय मल्हार संघर्ष समितीचा आवाज; सामाजिक कार्यकर्ते गोकुळभाऊ नेहे यांची प्रशासनाला मागणी
कोपरगाव, दि. ७: (दिलीप गायकवाड)
तालुक्यातील कोकमठाण हद्दीत समृद्धी महामार्गाजवळील शिर्डी बायपास, नगर-मनमाड महामार्गावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले ऐतिहासिक बारव आज अत्यंत दुर्वस्थेत असून, या वास्तूच्या जतनाची मागणी तीव्र झाली आहे.
जय मल्हार संघर्ष समितीचे सामाजिक कार्यकर्ते गोकुळभाऊ नेहे यांनी या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधत, “ही बारव म्हणजे होळकरकालीन ऐतिहासिक वारसा असून, तिचे तातडीने जीर्णोद्धार करण्यात यावा,” अशी मागणी केली आहे. नेहे यांनी सांगितले की, कोकमठाण ग्रामपंचायतीकडून या बारवात सांडपाणी सोडले जात असून, त्यामुळे या वास्तूचा अवमान होत आहे. हे सांडपाणी सोडणे तात्काळ थांबविण्यात यावे, अशीही त्यांनी मागणी केली.
इतिहासाची साक्ष देणाऱ्या या परिसरात होळकर काळात अनेक बांधकामे करण्यात आली होती. हेमाडपंती शैलीतील मंदिराला अहिल्याबाईंनी ३२ पायर्या दिल्या होत्या, तसेच अनेक विहिरी व बारवा बांधण्यात आले. जुना बेलापूर रस्ता हा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जोडणारा महत्त्वाचा मार्ग होता, परंतु सध्या तोही बंद अवस्थेत आहे.
गोकुळभाऊ नेहे यांनी पुढे सांगितले की, “या ऐतिहासिक बारवाचे संवर्धन करून त्याला वारसा स्थळ म्हणून घोषित करावे. तसेच समृद्धी महामार्गाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे,” अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनीही या मागणीला पाठिंबा देत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.




















