कोपरगाव, दि.८.( दिलीप गायकवाड )
कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे तसेच कालव्यांचे पाणी अत्यंत भीषण स्वरूपात प्रदूषित झाले असल्याचा गंभीर आरोप सामाजिक नेते संजय काळे यांनी केला आहे. गोदावरी नदीत नारंदी, गारदा या उपनद्या तसेच विविध नाले, ओढे आणि शहरातील गटारांमधून मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत असल्यामुळे नदी व कालव्यांचे पाणी वापरण्यायोग्य राहिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संजय काळे यांनी गेल्या आठवड्यात गोदावरी नदी, कालवे, नारंदी व गारदा नाल्यातून विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करून ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. प्राप्त अहवालानुसार कालव्याच्या पाण्यात क्षारता, बायकार्बोनेट, क्लोराईड यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून आले आहे. गोदावरी नदीतील पाण्यातही हे घटक मर्यादेपेक्षा अधिक असल्याने हे पाणी शेतीसाठी वापरल्यास शेतजमिनीचे दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
गारदा नाल्यात संजीवनी कारखाना, गोदावरी डेअरी, महाविद्यालये तसेच औद्योगिक वसाहतींचे सांडपाणी थेट सोडले जात असल्याचा आरोप करत, गारदा नाल्याचा अहवाल अत्यंत धोकादायक असल्याचे काळे यांनी सांगितले. नारंदी नदीचे पाणीही अत्यंत दूषित असून त्यात रासायनिक घटकांचे प्रमाण जास्त असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रदूषित पाण्यामुळे शेती, पशुधन, जलचर जीवसृष्टी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे पाणी जमिनीत मुरल्याने शहरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून दीर्घकालीन आजारांना आमंत्रण मिळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
गोदावरी नदी व कालवे हे कोपरगाव तालुक्याच्या विकासाची मुख्य शिरा असून त्यांचे संरक्षण आणि प्रदूषणमुक्ती तातडीने होणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी तात्काळ दखल घेऊन सांडपाणी थेट नदीत सोडण्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.




















