९५,७९० कोटींचा प्रकल्प; ७२ हजार घरांचे पुनर्वसन…
मुंबई, दि.२९ ( प्रतिनिधी )
धारावी हे मुंबईचं नव्हे तर आशियातील सर्वात मोठं झोपडपट्टी क्षेत्र, लवकरच सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून ओळखलं जाणार आहे. हे केवळ स्वप्न नसून राज्य सरकारचं सामाजिक वचन आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धारावीच्या पुनर्जन्माचा नवा आराखडा उलगडला.
९५,७९० कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये राज्य सरकारची २०% आणि अदानी समूहाची ८०% हिस्सेदारी आहे. प्रकल्प अंतर्गत ७२,००० युनिट्सचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यामध्ये निवासी ४९,८३२ आणि औद्योगिक/व्यावसायिक १२,४५८ युनिट्सचा समावेश असेल.
सर्वांगीण विकासाचा आराखडा
धारावीकरांना हक्काची घरे देण्याबरोबरच, रोजगार, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सलोखा आणि शाश्वत नागरी सुविधांचा समावेश असलेले जीवन मिळणार आहे. धारावी हे केवळ झोपडपट्टीचे प्रतीक न राहता सामाजिक न्याय आणि आर्थिक परिस्थिती सक्षमीकरणाचे केंद्र बनेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
प्रकल्पांतर्गत मल्टी-मोडल ट्रान्सिट हब, मेट्रो लाईन ११ ची थेट जोडणी, १०८.९९ हेक्टर क्षेत्राचा विकास, ३८,००० चौ.मी.मध्ये शैक्षणिक व आरोग्य संस्था, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्रे, बाजारपेठा, ग्रंथालय यांचा समावेश असेल.
धारावी – सर्व धर्मांचा संगम
धारावीत सध्या २९६ धार्मिक स्थळं आहेत. या स्थळांच्या पुनर्वसनासाठी माजी मुख्य न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून निर्णय धारावीकरांच्या सल्ल्यानुसार व कायद्यानुसार घेतले जातील.
तंत्रज्ञानाची साथ
डिजिटल ट्विन टेक्नॉलॉजी, टेनेट मॅनेजमेंट सिस्टम, ड्रोन व लिडार वापरून ७९,४५५ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून दस्तऐवजीकरण सुरू आहे. यामुळे अचूकता आणि पारदर्शकतेला चालना मिळणार आहे.धारावी पुनर्विकास प्रकल्प हे फक्त पुनर्वसन नव्हे, तर धारावीकरांच्या जीवनशैलीत सकारात्मक परिवर्तन घडवणारे ऐतिहासिक पाऊल आहे, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले.




















