नवी दिल्ली,दि.१४ ( प्रतिनिधी )
भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष समारंभात पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कायदा व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना व इतर मान्यवर उपस्थित होते.
न्यायमूर्ती गवई यांनी निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडून पदभार स्वीकारला. खन्ना यांचा कार्यकाल १३ मे रोजी संपला होता.अमरावती (महाराष्ट्र) येथे २४ नोव्हेंबर १९६० रोजी जन्मलेले न्यायमूर्ती गवई हे आंबेडकरवादी विचारसरणीचे असून, माजी खासदार आणि राज्यपाल राहिलेले रा.सु. गवई यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी १९८५ मध्ये नागपूर विद्यापीठातून बी.ए. एल.एल.बी. पूर्ण केले आणि १९८७ मध्ये वकिलीला सुरुवात केली. न्यायालयीन सेवेत त्यांनी सहाय्यक सरकारी वकील, अतिरिक्त लोक अभियोजक, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली.
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठतेनुसार त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रपतींनी २९ एप्रिल रोजी त्याला मंजुरी दिली होती. त्यांचा कार्यकाल २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होईपर्यंत सहा महिन्यांचा असेल.न्यायमूर्ती गवई यांनी आजवर ७०० हून अधिक खंडपीठांमध्ये सहभाग घेतला असून ३०० पेक्षा अधिक निर्णयांचे लेखन केले आहे. त्यांच्या निर्णयांमध्ये संविधानिक, नागरी, फौजदारी, प्रशासकीय आणि पर्यावरणीय कायद्यांचा समावेश आहे.




















