कोपरगाव : दिलीप गायकवाड
कोपरगाव शहरातील भुयारी गटार योजनेतील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ‘माझं गाव माझं अभियान’ सामाजिक संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले उपोषण नगरपरिषदेच्या आश्वासनानंतर आज स्थगित करण्यात आले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. पराग संधान यांनी उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडविले.

दि. २० रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर भरत मोरे, अनिल गायकवाड, विनायक भगत यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपोषणास प्रारंभ केला होता. भुयारी गटार लाईनच्या कामात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या कामाची चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती.
आज दि. २२ रोजी नगराध्यक्ष मा. पराग संधान, नगरउपाध्यक्ष जितेंद्र रनशूर, गटनेते प्रमोद आढाव तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. सुहास जगताप यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. संबंधित प्रकरणाची चौकशी करून पुढील कामकाज नियमाप्रमाणे केले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष संधान यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात भुयारी गटार योजना राबविण्यात येत आहे. सुमारे २२७ कोटी ४५ लाख ७५ हजार ९१९ रुपयांचा हा प्रकल्प असून, सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरसूचीप्रमाणे हे काम गुजरात येथील मंगुकिया ब्रदर्स प्रोजेक्ट अँड जयंती सुपर (जे. व्ही.) या कंपनीस देण्यात आले आहे. या प्रकल्पास २७ ऑगस्ट २०२४ रोजी तांत्रिक मंजुरी, तर १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पाबाबत आक्षेप घेत ‘माझं गाव माझं अभियान’च्या कार्यकर्त्यांनी उपोषण पुकारले होते. नगराध्यक्ष पराग संधान व मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या मध्यस्थीमुळे अखेर हे आंदोलन शांततेत स्थगित झाले.




















