अहिल्यानगर, दि.२८ (प्रतिनिधी )
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर, खडकी, वाळकी या गावांसह तीन मंडळातील ४५ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती, बंधारे, रस्ते, घरे आणि पुलांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पशुधनाची हानी झाली असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पालकमंत्री विखे पाटील यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. अकोळनेर गावातील वालुंबा नदी परिसरातील हानीची पाहणी करत ग्रामस्थांकडून माहिती घेतली. खडकी येथे ऋषिकेश निकम व शकुंतला कोठुळे यांच्या शेतीतील पिकांचे नुकसान आणि सयाजी कोठुळे यांच्या कुटुंबाला दिलासा दिला. तसेच वाळकी गावातील पूल आणि मळा परिसरातील नुकसानही त्यांनी पाहिले.
वाळकी येथे अधिकाऱ्यांकडून आढावा घेत असताना विखे पाटील म्हणाले, “मागील ५०-६० वर्षांत एकाच दिवशी एवढा पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले नाही. या संकटाच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोणतीही व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही.”
ते पुढे म्हणाले की, पंचनामे लवकर व्हावेत यासाठी इतर तालुक्यांतील मनुष्यबळ तातडीने वापरण्यात यावे. खराब झालेले रस्ते, बंधारे तातडीने दुरुस्त करावेत. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरीत राबवाव्यात.
पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून इतर तालुक्यांमधून चारा आणावा, तसेच घरांचे नुकसान झालेल्यांसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये निवाऱ्याची आणि जेवण, पाणी, औषध यांची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार शिवाजी कर्डीले, काशिनाथ दाते, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिप सीईओ आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
“नदी-ओढ्यांच्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई”
पालकमंत्री विखे पाटील यांनी नदी-ओढ्यांच्या अतिक्रमणांबाबत चिंता व्यक्त करत सांगितले की, अतिक्रमणांमुळे प्रवाह बदलल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे. भविष्यात अशी स्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून अतिक्रमण हटवावी, असे आवाहन त्यांनी केले.




















