ठाणे, दि. ३ ( अजय मगरे)
*ठाणे महानगरपालिका एकीकडे आर्थिक तूट, निधीअभावी विकासकामे रखडल्याचा दावा करत सुमारे ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याची तयारी करत आहे*. मात्र दुसरीकडे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या आलिशान वाहनांची खरेदी केली जात असल्याचा निषेध
*शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे* यांनी केला आहे.
याबाबत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देऊन वाहन खरेदीचा निर्णय कोणी घेतला, त्यास मंजुरी कोणत्या ठरावाद्वारे देण्यात आली, आर्थिक तूट असताना निधी कोणत्या तरतुदीतून उपलब्ध करण्यात आला, यासह विविध प्रश्नांची लेखी उत्तरे देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याचबरोबर ब्रह्माळा तलाव परिसरात झाड पडून गंभीर जखमी झालेल्या **सौ. दीपा चौधरी** यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दोन वेळा निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नसल्याचा आरोप ऋषिकेश तायडे यांनी केला.
“एका जखमी नागरिकाला न्याय देण्यासाठी निधी नसल्याचे सांगितले जाते, मात्र महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान वाहनांसाठी लाखो रुपयांचा निधी सहज उपलब्ध होतो. ही जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टी असून नागरिकांशी अन्याय करणारी भूमिका आहे,” असे ऋषिकेश तायडे यांनी म्हटले आहे.
महापालिका प्रशासनाने सौ. दीपा चौधरी यांना तात्काळ न्याय व योग्य नुकसानभरपाई द्यावी तसेच आलिशान वाहन खरेदीबाबत सर्व माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अन्यथा शेतकरी कामगार पक्ष, ठाणे शहरच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या आर्थिक तुटीच्या दाव्याचा निषेध म्हणून *भिक मागो आंदोलन* करण्यात येईल. या आंदोलनाची सुरुवात आयुक्तांच्या दालनातून करण्यात येणार असून त्यानंतर *महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या दालनात* जाऊन प्रतीकात्मक स्वरूपात भिक मागण्यात येईल. जखमी नागरिकांना न्याय देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ही प्रतीकात्मक मागणी असेल, असे ऋषिकेश तायडे यांनी स्पष्ट केले.




















