एआयवर आधारित सुरक्षा प्रणालीसह प्रवास अधिक सुरक्षित
ठाणे, दि.२८ ( प्रतिनिधी )
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रणालीवर आधारित स्मार्ट बस लवकरच मार्गस्थ होणार आहेत. या बसमधील सुरक्षाव्यवस्थेची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केली.
ठाणे-नागपूर मार्गावर धावणाऱ्या या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या आयटी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून, एआय प्रणालीच्या वापरामुळे प्रवास अधिक विश्वासार्ह आणि संरक्षित होणार आहे.”
या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, चालकाच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर तसेच प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय, एलईडी स्क्रीन, जीपीएस, फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली यासारखी आधुनिक उपकरणे या बसमध्ये बसवण्यात आली आहेत.
महिला प्रवाशांसाठी सुरक्षिततेचा अधिक भर
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “महिला प्रवाशांसाठी ही बस अधिक सुरक्षित ठरणार आहे. चालकाला झोप येत असल्यास किंवा तो मद्यप्राशनस्थितीत असल्यास त्वरित सायरनद्वारे सूचना मिळेल. परिणामी, संभाव्य अपघात टाळता येणार असून प्रवास अधिक सुरक्षित होईल.”
परिवहन मंत्री सरनाईक यांच्या प्रयत्नामुळे ही प्रणाली एसटीमध्ये अंमलात आणली जात आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे परिवहन व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडत असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी काढले.
स्मार्ट बसमध्ये काय काय खास आहे. पुढील प्रमाणे..
ADAS प्रणाली – प्रगत चालक सहाय्यक प्रणाली
ड्रायव्हर मॉनिटरिंग कॅमेरे – चालकाच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे कॅमेरे
ब्लाइंड स्पॉट कॅमेरे – 360 अंशातील दृश्य दाखवणारी प्रणाली
सीसीटीव्ही कॅमेरे – प्रवाशांच्या भागात एकूण चार कॅमेरे
मोबाईल जीपीएस ट्रॅकिंग – बसची थेट स्थिती ट्रॅक करणारी प्रणाली
एलसीडी स्क्रीन व उद्घोषणा यंत्रणा – प्रवाशांसाठी सूचना व माहिती देणारे माध्यम
या स्मार्ट बसमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार असून, नागरिकांना प्रवासात अधिक विश्वास, सुरक्षा आणि सुविधा मिळणार आहेत.




















