धारावी मास्टर प्लॅन प्रसिद्ध – पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक विकासाला चालना – मुख्यमंत्री
मुंबई, दि. २८ ( प्रतिनिधी )
देशाच्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीपैकी एक असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी तयार करण्यात आलेला मास्टर प्लॅन आज अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा मास्टर प्लॅन पर्यावरणपूरक, एकात्मिक आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीकोनातून राबवण्यात येणार असून, स्थानिक कारागिरांचे पुनर्वसन, व्यावसायिक क्षेत्राचा सन्मान आणि मूळ रहिवाश्यांना न्याय देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत या मास्टर प्लॅनची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “धारावीचा पुनर्विकास करताना केवळ घरे नव्हे, तर येथील पारंपरिक व्यवसाय, कौशल्याधारित कामगार, आणि सामाजिक रचना जपणे अत्यंत आवश्यक आहे. या मास्टर प्लॅनमध्ये प्रत्येक पात्र धाराविकराला घर आणि व्यवसायासाठी आवश्यक जागा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. धारावीचे मूळ वैशिष्ट्य जपतच आधुनिक शहररचनेसह विकास घडवण्याचा आपला संकल्प आहे.”
धारावीतील सूक्ष्म उद्योजकता, स्थानिक कारागिरी आणि पारंपरिक व्यवसायांचे जतन करत त्यांच्या पुनर्वसनासाठी खास धोरणे या मास्टर प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच, प्रकल्पात सहभाग असलेल्या प्रत्येक धाराविकराच्या हक्कांचे संरक्षण करण्यावर भर दिला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि प्रशासकीय कार्यवाही वेगाने पार पाडण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास यांनी या वेळी प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर केली.या बैठकीस महसूल, गृहनिर्माण, नगरविकास, नियोजन, वित्त, म्हाडा आणि एमएमआरडीए विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




















