कोपरगाव : दिलीप गायकवाड
अहिल्यानगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील शिर्डी बायपास मार्गावर कोपरगाव तालुक्यातील पुणतांबे फाटा येथे सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामादरम्यान मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. रविवार (दि. २८ जुन) सायंकाळी सुमारे ७ वाजता सुरू झालेल्या जोरदार पावसात पुलाच्या पूर्व बाजूस काही महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला सर्व्हिस रोड वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याचे दिसून आले आहे.
सोमवारी दि.२९ सकाळी संबंधित ठेकेदार यादव कन्स्ट्रक्शन कंपनीने हा मार्ग बंद करून दुरुस्तीचे काम सुरू केले. अपूर्ण असलेल्या पश्चिमेकडील मार्गावर वाहतूक वळविण्यात आली. वाहून गेलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत असल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रस्ता बांधकामात आवश्यक दगड-खडी व डांबराचा दर्जेदार वापर न करता केवळ मुरूम टाकून त्यावर डांबराचा पातळ थर देण्यात आल्यामुळे पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
श्री जगदंबा माता मंदिर ते जगताप वस्ती दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. या समस्येची माहिती स्थानिक आमदारांनाही असून त्यांनी स्वतः या भागाची पाहणी केल्याचे नागरिकांनी सांगितले. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
यादव कन्स्ट्रक्शन कंपनी, संबंधित यंत्रणा आणि राज्य सरकारने या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याशिवाय, या परिसरात यापुढे वाहतूक कोंडी होऊ नये, रस्त्यावर पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारावी, अपघात प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात तसेच पुणतांबे फाटा येथे २४ तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशा मागण्याही नागरिकांनी केल्या आहेत.




















