कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
मुंबई : अजय मगरे
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रेल्वेसाठी आवश्यक तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. तसेच डिसेंबरअखेर बीड-मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सह्याद्री अतिथीगृहात ‘अहिल्यानगर-बीड-परळी’ रेल्वे मार्गाच्या प्रगतीसह बीड-पुणे आणि बीड-मुंबई रेल्वे सेवांचा आढावा घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी रेल्वे आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बीड-पुणे रेल्वेमुळे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी जिल्ह्याची थेट रेल्वे जोडणी होणार असून कृषी, उद्योग, शिक्षण, व्यापार आणि सामाजिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल. नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्चही कमी होण्यास मदत होणार आहे.
बीडला रेल्वे जोडण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांतून ‘अहिल्यानगर-बीड-परळी’ प्रकल्पाला गती मिळाली. गतवर्षी १७ सप्टेंबरला बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाली. आता याच दिवशी बीड-पुणे रेल्वे सुरू होणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
मुंबई रेल्वेसाठी ‘डेडलाइन’
बीड-मुंबई रेल्वे सेवा डिसेंबरअखेर सुरू करण्यासाठी आवश्यक कामांचा कालबद्ध आराखडा तयार करून युद्धपातळीवर कामे पूर्ण करा, असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. बीड-पुणे आणि बीड-मुंबई रेल्वे ही केवळ वाहतूक सुविधा नसून जिल्ह्याच्या विकासाची नवी जीवनवाहिनी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.




















