ठाणे, दि.३१. ( अजय मगरे )
भारतीय बौद्ध महासभा ठाणे महानगर जिल्हा शाखा अंतर्गत अंबिका नगर वॉर्ड शाखेतील वेळुवन बुद्ध विहारात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले. दिनांक ३१ ऑगस्ट रोजी या मालिकेतील अकरावे पुष्प गुंफले गेले.

या दिवशी विहार परिसरात शांतता, करुणा आणि प्रज्ञेचे एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित असंख्य धम्मोपासकांच्या मनात उत्साह व भक्तिभाव जागृत झाला होता. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय सचिव, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक, गायक, कवी, लेखक व प्रवचनकार आदरणीय एम. डी. सरोदे गुरुजींनी “बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी शब्दांनी उपस्थितांच्या अंतःकरणात करुणा, मैत्री आणि समतेचे तत्त्व जागृत झाले.
धम्मकार्याला सहकार्य करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे शहर उपाध्यक्षा छायाताई बचुटे तसेच धम्म उपासिका तुळसाबाई मोरे यांनी धम्म दान अर्पण केले. त्याचप्रमाणे ठाणे महानगर जिल्हा सचिव नामदेव झिने गुरुजींनी वर्षावास सांगता समारोप कार्यक्रमासाठी ५००० रुपयांचे आर्थिक धम्म दान देत दान पारमिता जोपासली.
या पवित्र प्रसंगी विभागातील शेकडो धम्म मोठ्या संख्येने उपस्थित होते. विहार परिसरात बौद्ध धम्माची शांत, करुणामयी व समतेची शिकवण अनुभवायला मिळाली.
वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन अध्यक्ष सुशांत शिवाजी साबळे,सरचिटणीस : आशाताई मधुकर जाधव, कोषाध्यक्ष पप्पू शंकर गायकवाड यांनी केले.




















