नवी मुंबई, (सतीश गायकवाड )
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला आहे. नवी मुंबई संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री मारुतीराव खुटवड यांच्या पुढाकाराने व सहकार्याने शहरातील कार्यकर्त्यांनी मुंबईत दाखल झालेल्या मराठा समाज बांधवांसाठी भोजनदानाची व्यवस्था केली आहे.

आरक्षणासाठी एकमुखी मागणी करत राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या बांधवांना जेवणाच्या सोयीअभावी त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भोजनदान उपक्रम राबवून आंदोलनकर्त्यांना मदतीचा हात दिला.
सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईत गर्दीचे वातावरण आहे. तरीदेखील मराठा समाजाच्या ऐतिहासिक आरक्षणासाठी पाच लाखांहून अधिक बांधवांची उपस्थिती लक्षणीय ठरत आहे. त्यांना भोजनाची सोय करून देत संभाजी ब्रिगेडने फक्त संघटनात्मक पाठिंबा नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीच्या माध्यमातून ठोस भूमिका घेतली आहे.
जिल्हाध्यक्ष शिवश्री मारुती खुटवड यांनी सांगितले की, “सरकारने विलंब न लावता मराठा समाजाला न्याय द्यावा व आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय घ्यावा, हीच आमची मागणी आहे.”
यामुळे नवी मुंबईतील संभाजी ब्रिगेडने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला दृढ पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.




















